कृष्णा कारखान्यावर इंद्रजीत काका कार्यप्रेरणा व यशस्वीतेसाठी म्हणाले…

कराड | आयुष्यात काहीतरी घडविण्यासाठी विपरीत परिस्थितीत स्वतःला सिद्ध करावे लागते. अशीच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते. सकारात्मकता हाच यशाचा पाया असल्याचे प्रतिपादन व्याख्याते इंद्रजीत देशमुख यांनी केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणेशोत्सवानिमित्त ‘कार्यप्रेरणा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले होते. याप्रसंगी फायनान्स मॅनेजर राजाराम चन्ने, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, जनरल मॅनेजर (डिस्टलरी) विकास आभाळे, कार्यालयीन अधीक्षक निलेश देशमुख, संचालक गुणवंतराव पाटील, संजय पाटील, शिवाजी पाटील, एम के कापूरकर, बाळासाहेब पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंद्रजीत देशमुख पुढे म्हणाले, जीवनात सकारात्मकता आवश्यक आहे. पराभवाकडून यशाकडे जाताना स्वतःमध्ये बदल घडविले, तर नक्कीच यश मिळेल. ध्येयनिश्चितीसाठी परिश्रम आणि जगातील चांगल्या म्हणजेच प्रेरणादायी व्यक्तींचा सहवास लाभणे आवश्यक आहे. ज्यांना का जगायचे, कसे जगायचे हे कळले, की आयुष्याचा मार्ग सुकर होतो. म्हणजेच चांगल्या व्यक्तींच्या कार्याची प्रेरणा घेणे आवश्यक आहे. तसेच मानवाने मिळालेल्या क्षणांचा योग्य विनियोग करणे, असलेल्या परिस्थितीला प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देणे, म्हणजेच प्रेरणादायी. तसेच प्रतिक्रियावादी न होता प्रतिसादवादी होणे म्हणजेच प्रेरणादाय होय, असेही देशमुख यांनी सांगितले.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, मानवाकडे आज सर्व सुख सोयी, सुखाची साधने असूनही माणूस दुःखी आहे. त्याचे कारण मानसिकता आहे. लोकांनी सकारात्मक विचार केला पाहिजे. ज्याच्यामुळे आयुष्य सुखी होईल. प्रत्येक व्यक्ती आपल्या कामाशी, विचारांशी, सिध्दांतांशी प्रामाणिक असला पाहिजे. एकमेकांना सहाय्य करून आपल्याला पुढे जायचे आहे. अलीकडे मोबाईलचे व्यसन युवक पिढीमध्ये वाढले आहे. त्याच्या आहारी जावू नये. असे आवाहन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले.