रयत स्वाभिमानी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सागरदादा पवार

सातारा । सामाजिक उन्नतीच्या दिशेने पाऊले टाकण्याचा निर्धार करीत स्थापन झालेल्या रयत स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी साताऱ्यातील युवा नेतृत्व सागरदादा पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. रयत स्वाभिमानी संघटनेचे सरचिटणीस रविराज काळे यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच सागरदादा पवार यांना बहाल केले आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाची दखल घेऊन संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना दिल्याचे पत्रकात म्हटले आहे.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तन- मन- धन अर्पण करून कार्यरत असल्याने तसेच रयत स्वाभिमानी संघटनाही त्याच विचारधारेने कार्यरत असल्याने या संघटनेतर्फे प्रदेशाध्यक्षपदाचा बहुमान सागरदादा पवार यांना दिली आहे. समाजातील उपेक्षित व दुर्बल घटकांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडून संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी रयत स्वाभिमानी संघटना सक्रिय आहे. सागरदादा पवार यांच्या तळमळीच्या समाजसेवेची दखल घेऊन व त्यांच्यासारख्या तडफदार व्यक्तिमत्त्वाला संघटनेच्या माध्यमातून आणखी बळ मिळावे या उद्देशाने त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन प्रदेशाध्यक्षांच्या सेवाभावी वृत्तीचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा, या हेतूने व छत्रपती शिवराय, शाहू – फुले- आंबेडकर यांच्या विचारधारेवर श्रद्धा आणि विश्वास ठेवून संघटनेच्या ध्येय धोरणानुसार सागरदादा पवार कार्यरत राहतील, अशी कार्यकर्त्यांचीही खात्री आहे. त्यामुळेच संघटनेच्या या महत्त्वपूर्ण पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्षपदी निवडीबद्दल नुकताच संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सागरदादांचा सत्कारही करण्यात आला. त्यावेळी संघटनेचे प्रमुख संघटक ऋषिकेश कानवटे, सातारा जिल्हाध्यक्ष सुशीलभाऊ कदम, जिल्हा सचिव अभय जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे, उपाध्यक्ष सागर आढाव, सचिव राजू काळे, संदीप जाधव आदींनी अभिनंदन केले. प्रदेशाध्यक्षपदाचा सन्मान दिल्याबद्दल सागरदादा पवार यांनी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले. संघटनेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल समाधान व्यक्त करून अडचणीच्या काळातील सर्व संकटांवर मात करीत उज्वल कामगिरी करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच संघटनेच्या आगामी ध्येयधोरणांची आखणी करण्याचे ठरवत त्याबाबतची माहितीही उपस्थितांना दिली.