दुशेरे येथे ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त हुतात्मा स्मृती स्तंभास अभिवादन

कराड | भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी अनमोल योगदान दिले असून, त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन तरुण पिढीने काम करावे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केले. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दुशेरे (ता. कराड) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ब्रिटीशांना भारतातून हाकलून लावण्यासाठी 9 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनाची हाक देण्यात आली. या आंदोलनामुळे भारतीय जनतेच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविले गेले. ज्याची परिणिती म्हणून जनतेच्या अपरिमित संघर्षातून भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. भारत छोडो आंदोलनाचा हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने दुशेरे (ता. कराड) येथील हुतात्मा स्मारक स्तंभाला डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते ध्वजवंदनही करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आनंदा जाधव, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, माजी संचालक माणिकराव जाधव, सरपंच आनंदा गायकवाड, उपसरपंच अर्जुन जाधव, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे, तलाठी विशाल पाटील, ग्रामसेवक संतोष सणस, सुभाषराव जाधव, मारुती जाधव, बाळासो जाधव, लक्ष्मण पवार, चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, सयाजी पाटील, पांडुरंग जाधव, दिलीप जाधव, हणमंत जाधव, धनाजी जाधव, शहाजी जाधव, मयूर जाधव, महेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.