लोकसभा रणांगण : APMC मार्केट अन साताऱ्याचा काय संबंध भाऊ?

विशाल वामनराव पाटील
सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगला असून नक्की लोकसभेची निवडणूक साताऱ्याची की मुंबईच्या मार्केट कमिटीचे असा प्रश्न आता सातारकरांना पडू लागला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात विकास कामे काय होणार? यापूर्वी काय केले याच्या ऐवजी भ्रष्टाचाराचा मुद्दाच या ठिकाणी गाजू लागला आहे. त्यामुळे APMC मार्केटचा आणि सातारा जिल्ह्याचा काय संबंध रं भाऊ… असं सामान्य जनता आता विचारू लागले आहे.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांच्या वरती एपीएमसी मार्केट मधील शौचालय घोटाळ्या संदर्भात भ्रष्टाचाराच्या आरोप होऊ लागले असून 2014 सालच्या प्रकरणात आत्ता विरोधक जागे झाले आहेत. सदरचा मुद्दा केवळ निवडणूक लागल्याने समोर आणला जात असल्याचे हे दिसून येत आहे. तर दुसरीकडे शौचालय घोटाळ्या संदर्भात शशिकांत यांच्याकडूनही स्पष्टीकरण दिले जात आहे. अशा परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यात येणाऱ्या काळात काय विकास होणार? या उमेदवारांना का? निवडून द्यायचे याबाबत मात्र कोणताही प्लॅन दोन्ही उमेदवारांकडे समोर नसल्याचे दिसत आहे. केवळ निवडणूक प्रचारादरम्यान आरोप- प्रत्यारोप करून लोकांचे मतदान मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसून येत आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून यापूर्वी तीनदा लोकसभा निवडणूक लढले असून त्यावेळी ते जिंकले होते. त्यानंतर पोट निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभवा नंतर उदयनराजेंना राज्यसभेवर भाजपाने त्यांना संधी दिली. गेली 13 ते 15 वर्षे त्यांनी राजकारणात पदावरती घालवली आहेत. तर शशिकांत शिंदे यांनीही कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदारकी भोगलेली आहे. दोन्ही उमेदवार राजकारणात अनेक वर्षापासून असून आता लोकसभेच्या निमित्ताने एकमेकांसमोर दंड थोपटत आहेत.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यापूर्वी संसदेत गेले असून राज्यसभेवर भाजपा कडून त्यांना संधी देण्यात आली आहे. अशावेळी त्यांनी या निवडणुकीत काय- काय काम केली हे जनतेपुढे सांगणे गरजेचे आहे. तसेच आता निवडणुकीच्या निमित्ताने समोर जाताना लोकांना जिल्ह्यात कोणता उद्योग- व्यवसाय आणणार, बेरोजगार तरुणांना काय आश्वासने देणार, सातारा- कराड या दोन्ही विभागाचा समतोल कसा राखणार याविषयी प्रचारादरम्यान कोणतेही मुद्दे दिसत नाहीत. शशिकांत शिंदे हे ऐनवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले असून विकास कामाबाबत कमी पडणार नसल्याचे केवळ सांगितले जात आहे. या सर्वांमध्ये सातारा जिल्ह्याचा नक्की कोणता विकास प्रभावीपणे राबवला जाणार. याकरता दोन्ही उमेदवाराकडून स्पष्टता दिली जात नाही.
भाजपाकडून एपीएमसी शौचालय घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला जात असून त्यामध्ये शशिकांत शिंदे यांच्या वरती चार हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला जात आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याकडून आपण कोणताही घोटाळा केला नसून विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. त्यांना पराभव दिसू लागल्याने एपीएमसी मार्केट मधील घोटाळ्याचा मुद्दा समोर आणला जात असल्याचं म्हटल आहे.
(उद्याच्या भागात : सातारा जिल्ह्यातील मार्केट कमिटीचं काय?)