Satara News : राधानगरी- स्वारगेट धावती ‘विठाई’ बस महामार्गावर पेटली
बस ड्रायव्हरमुळे 40 प्रवाशी सुखरूप

सातारा | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात निघालेल्या एसटी धावत्या बसने पेट घेतला. राधानगरी- स्वारगेट एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी सकाळी सातारा जिल्ह्यातील आनेवाडी टोलनाक्याजवळ घडली. एसटी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील 30 ते 40 प्रवाशांचे प्राण वाचले. सरकारने आषाढी एकादशी निमित्ताने सुरू केलेली ‘विठाई’ ही बस आगीत जळाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील आनेवाडी टोल नाक्याजवळ उड्डाणपुलावरून जाताना एसटी बसने अचानक पेट घेतला. यावेळी बसमधील चालकाच्या हे लक्षात येताच, त्याने प्रसंगावधान राखत बस जागीच थांबवली आणि बसमधील प्रवाशांना तात्काळ बसमधून उतरण्याच्या सूचना केल्या. प्रवाशांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच बसमधून खाली उतरले.
बसला लागलेली आग इतकी भीषण होती कि बससह बसमधील साहित्यही जळून खाक झाले. बसला लागलेल्या आगीमुळे महामार्गावर धुराचे लोट पहायला मिळाले. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ खोळंबली. तसेच वाहतूक सेवा रस्त्यावर वळविण्यात आली. दरम्यान, या घटनेची माहीती मिळताच अग्निशमक गाडी तात्काळ आली, मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती.