कराडच्या हिम्मतराव पाटील यांना शासनाचा “वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार” जाहीर

कराड – महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा राज्य पातळीवरील अत्यंत मानाचा “वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार” कराड तालुक्यातील पश्चिम सुपने येथील हिम्मतराव हिंदुराव पाटील यांना जाहीर झाला आहे. या कृषी पुरस्काराचे वितरण 1 जुलैला कृषीदिनी मुंबई येथील डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे होणार आहे.
या पुरस्काराचे वितरण राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, मंत्री भरतशेठ गोगावले, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक आदीच्या उपस्थित पुरस्कार वितरण होणार आहे.
हिम्मतराव पाटील यांनी आपल्या शेतीमधील सातत्यपूर्ण प्रयोगशीलता, अथांग परिश्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांमुळेच आज साताऱ्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र शासनाने 2024 सालचे पुरस्कार जाहीर केले असून कराडच्या या शेतकरी पुत्राचा गाैरव होणार असल्याने कृषी विभाग, शेतकरी मित्र तसेच परिसरातील लोकांनी त्यांचे अभिनंदन केले.
सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे पवार, कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, तंत्र अधिकारी रियाज मुल्ला, कराडचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी अभिनंदन केले. तर तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, मंडल कृषी अधिकारी अोंकार बर्गे, उप कृषी अधिकारी विनोद पुजारी, सहाय्यक कृषी अधिकारी मंगला साळुंके, सहाय्यक कृषी अधिकारी धनश्री होवाळ यांनी हिम्मतराव पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.



