ओबीसी समाजाची दिशाभूल करीत भाजपचे खोटे- नाटे आरोप : रणजितसिंह देशमुख
वडूजमध्ये राहूल गांधी समनार्थ काँग्रेस व राष्ट्रवादीचा एल्गार

पुसेसावळी | काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी भाजप सरकारच्या अनागोंदी कारभाराबाबत आवाज उठविल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द केली जाते ही निंदनीय बाब आहे. भाजपच्या सत्ता काळात देशाची लोकशाही व संविधान धोक्यात आले असून देशाला पुन्हा स्वातंत्र्य मिळवून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ओबीसी समाजाची दिशाभूल करीत भाजपचे राज्यकर्ते खोटे- नाटे आरोप करीत असल्याचा घणाघात अखिल भारतीय काँग्रेस सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी केला.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने येथे मोर्चा काढून तहसिलदार कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी सभापती अशोकराव गोडसे, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, माजी तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, मानाजी घाडगे, माजी नगराध्यक्ष महेश गुरव, युवकचे जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, राजूभाई मुलाणी, पृथ्वीराज गोडसे, मोहनराव देशमुख, सत्यवान कमाने, सत्यवान कांबळे, श्रीकांत काळे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अक्षय थोरवे, तानाजी वायदंडे, विजय शिंदे, अभयकुमार देशमुख, परेश जाधव, ॲड. संदिप सजगणे, माण तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, हणमंत भोसले, ज्ञानेश्वर शिंदे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुजाता महाजन, शारदा भस्मे, सलमा डांगे, अनिता बोडके ,ज्योती मिसळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तहसिलदार कार्यालयापर्यंत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.
यावेळी महेश गुरव म्हणाले, मोदी आडनावाचे अनेक जाती- प्रांतामध्ये लोक आहेत. इतर मागासवर्गीय समाजाचा आधार घेऊन भाजपचे राज्यकर्ते कुटील पध्दतीचे राजकारण करीत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते त्यावेळी त्यांच्यावर कारवाई का केली नाही. याचे उत्तर सर्वसामान्य जनतेला द्यावे. सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय शिंदे म्हणाले, के़ंद्रातील मोदी सरकारने अनेक भूलथापा देऊन देशातील जनतेला फसविले आहे. या सरकारचे अस्तित्व धोक्यात येऊ लागल्याने त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज बंद केला जात आहे. अश्या कुटील राजनिती चे पितळ उघडे पडले आहे.म्हणूनच जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे पाप भाजपा नेते मंडळीं करीत आहेत.
मोदी हटाव..देश बचाव…वडूज परिसरात नारा घुमला…
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वतीने राहूल गांधींच्या समर्थनार्थ मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. या दरम्यान विविध नेतेमंडळींनी भाजप कारभाराचा खरपूस समाचार घेतला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी मोदी हटाव..देश बचावचा नारा देत परिसर दणाणून सोडला.