Satara News : कोंबड्यांना विषारी औषध घालून मारल्या, पुतण्यावर गुन्हा नोंद

सातारा । विषारी औषध घालून कोंबड्यांना मारून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत किसन पांडुरंग सूर्यवंशी (रा. ताईचीवाडी, पो. शिरळ, ता. पाटण) यांनी कोयनानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून त्यांचा पुतण्या पांडुरंग वसंत सूर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ताईचीवाडी येथे किसन सूर्यवंशी हे कुटुंबासह राहण्यास आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या अकरा कोंबड्या व गावातीलच प्रकाश ज्योतिराम सूर्यवंशी यांच्या पाच कोंबड्यांना विषारी औषध देऊन पुतण्या पांडुरंग सूर्यवंशी याने ठार मारले होते. त्यानंतर रविवारी त्याने आणखी पाच कोंबड्यांना विषारी औषध देऊन ठार केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर किसन सूर्यवंशी यांनी कोयनानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सदरील प्रकारामुळे ताईचीवाडी, शिरळ गावातील लोकांच्यातून संताप व्यक्त करण्यात आला. अशाप्रकारे कोंबड्यांना विष दिल्याने त्याचा तडफडून मृत्यू झाला. वारंवारं अशा प्रकारे पुतण्याचे धाडस वाढू लागल्याने आणि आर्थिक नुकसान होत असून कोंबड्यांचा बळी जात असल्याने कोयनानगर पोलीसात फिर्याद देण्यात आली. त्यावरून पुतण्या पांडुरंग सुर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार संजय बोबडे करत आहेत.