अमर रहे अमर रहे : शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
साताऱ्यातील शहापूरच्या जवानाला मानवंदना


सातारा : शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर आज शहापूर (ता. कराड) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली. यावेळी आमदार मनोज घोरपडे, आमदार डॉ. अतुल भोसले, माजी आमदार बाळासाहेब पाटील, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, जिल्हा परिषद सदस्या विद्याताई वेताळ, निवास थोरात, हिंदकेसरी संतोष वेताळ, जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओमकार कापले, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी शहीद जवान अर्जुन जाधव यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
यानंतर वीर पत्नी सायली, मुलगा सर्वेश, वीर पिता राजेंद्र, वीर माता सुरेखा, भाऊ ऋषिकेश, बहिणी रेश्मा चव्हाण पूनम पाटील यांनी अंतिम दर्शन घेतले. यानंतर शहीद अर्जुन जाधव यांच्या पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना जवान अर्जुन राजेंद्र जाधव (वय- 30) यांना हॅन्ड ग्रॅनाईटच्या स्फोटात वीरमरण आले. लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे ते जवान होते .सध्या काश्मीरमध्ये 8 RR मध्ये कार्यरत होते. या महिन्यात 25 जून रोजी त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ते 15 जूनला सुट्टीवर येणार होते. त्या अगोदरच त्यांना वीरमरण आल्याने कुटुंबासह संपूर्ण शहापूर गावावर शोककळा पसरली होती.



