चचेगावला वारस नोंदीसाठी लाच घेताना येरवळेच्या महिला तलाठी सापडल्या


कराड :- चचेगाव (ता.कराड) येथील वारस नोंदीसाठी मागणी केलेली अडीच हजार रूपयांची लाच घेताना महिला तलाठ्याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. अर्चना रामचंद्र गावडे (रा. विश्रामनगर, भारती विद्यापीठाच्या मागे मलकापूर) असे महिला तलाठ्याचे नाव आहे. याबाबत कराड तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना गावडे या येरवळे सजाच्या तलाठी आहेत. त्यांच्याकडे चचेगावचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तेथील तक्रारदाराची आजी मयत झाल्याने तीच्या नावे असलेलेल्या क्षेत्रावरून तीचे नाव कमी करून वडील व चुलत्यांचे नाव वारसहक्काने लावण्याबाबत त्यांच्या वडीलांनी 29 जानेवारी 2026 रोजी अर्चना गावडे यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जाचा पाठपुरावा तक्रारदार करीत होते.
दरम्यान, 7 एप्रिल 2026 रोजी तलाठी गावडे यांनी वारस हक्काची नोंद घेतली. मयत आजीच्या नावे असलेल्या क्षेत्रवरून तीचे नाव कमी करून त्यांचे वडील व चुलत्यांची वारस नोंद करण्यात आली. मात्र वारस नोंद केली म्हणून तलाठी अर्चना गावडे या अडीच हजार रूपयांची लाच मागत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी 2 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 व 3 जून रोजी केलेल्या पडताळणीत गावडे यांनी अडीच हजार रूपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शैला कोरडे व पथकाने केली. याबाबत तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील करीत आहेत. लोकसेवक शासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांचा एजंट लाचेची मागणी करीत असल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



